Monday, November 17, 2008

अरुण देशपांडे आणि Sustainable Development - भाग २

अनिल अवचटांच्या कार्यरत पुस्तकातून अरूण देशपांडेंची ओळख झाली. अरूण देशपांडे स्वतःएक अभियंता आणि हाडाचे संशोधक आहेत. साधारण प्रगती आणि विकासाच्या आपल्या ज्या काही (शहरी) संकल्पना असतात, त्या खरोखरच निरंतर (sustainable) आहेत का, हा एक खूप मोठा प्रश्न आहे. या बाबतीत डोकं शांत ठेवून थोडासा जरी अभ्यास केला, की आपल्या पिढीसमोरील प्रचंड ऊर्जासंकट लगेचच लक्षात येतं. सोलापूरजवळ अंकोली या लहानश्या खेड्यात अरूण देशपांडेंनी शेतीच नव्हे तर एकूणच Sustainable Development या विषयावर केलेलं संशोधन आणि प्रयोग हा आश्चर्यांचा खजिना आहे. वरकरणी अरूण देशपांडे फार टोकाची भूमिका घेताहेत असं वाटतं,पण जेव्हा ते प्रत्येक गोष्टींची गणित मांडून आकडेवारी देतात तेव्हा आपण गप्प होतो.

मी सोलापूरचाच असल्याने या भागातील पाण्याचे दुर्भिक्ष्य मला चांगलंच माहित्येय. त्यामुळेच त्यांनी फुलवलेली शेती ही फार कौतुकास्पद गोष्ट आहे.या वर्षी ऑगस्टमधे खरं तर त्यांना भेटण्याची आणि त्यांचा प्रयोग परिवार पाहण्याची फार इच्छा होती, पण त्यावेळी ते स्वत: भारतात नसल्याने जमलं नाही. पण त्यांचे सहकारी संजय म्हेत्रस यांना सोलापुरात भेटून त्यांच्याशी अगदी मोकळ्या गप्पा मारता आल्या. माझी त्यांच्या कामाशी जशी जशी ओळख होतेय, तसा तसा मी जास्त प्रभावित होतोय.

या गोष्टींचा अभ्यास करताना एक दुहेरी अस्वस्थता मात्र आहे. पहिली म्हणजे, इतकी वर्षं शिकूनही आपले व्यावहारिक ज्ञान शून्य आहे याची जाणीव होतेय. अशा विषयांवर कधीही विचार/चर्चा करण्याची वेळ येवो, आम्ही लोकं फक्त CCD मधे कॉफी पीत अकलेचे तारे तोडत असतो. 'मेधा पाटकर' आणि 'नर्मदा बचाव आंदोलन' वगैरे विषय निघाले, की प्रत्येकाला आपलं मत मांडायची एवढी घाई असते, की विचारू नका. बरं ही मतं मांडण्याआधीचा आमचा अभ्यास काय? तर इकडून तिकडून वाचलेलं काहीतरी अर्धवट आणि पूर्वी ऐकलेल्या असल्याच गप्पा.

अर्धवट शिक्षणातून येणारा हा आडमुठेपणा नकोसा होतोय आता.

दुसरी अस्वस्थता म्हणजे एकूणच संशोधन आणि काम याबद्दल असणार्या आपल्या स्वतःच्याच संकल्पनांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होतंय. संशोधन, Ph.D. , काम या विषयांबाबत जेव्हा कधी आमच्या गप्पा होतात, तेव्हा भारतात राहायचं असेल तर या गोष्टी बाजूला ठेवा असाच चर्चेचा सूर निघतो. भारतात अडचणी आहेत,हे मी मान्य करतो, पण या अडचणींवर तोडगा काढून कौतुकास्पद काम करणारी लोकंही आहेत. गडचिरोलिचे डॉ. अभय बंग असोत, महाडचे डॉ. बावस्कर किंवा अरूण देशपांडे असोत. (या तिघांचीही ओळख अनिल अवचटांच्या कार्यरत पुस्तकातून होते) या लोकांचं काम पाहिलं की आपण संभ्रमात पडतो. त्यामुळे सगळ्याच संकल्पना तपासून पाहण्याची गरज निर्माण होतेय. हे काम केवळ चांगलं नाहीये तर ते कितीतरी मोठं आणि प्रभावी आहे. शिवाय असं काम करण्यासाठी भारताशिवाय वेगळी जागा आहे का, हा दुसरा मोठा प्रश्न आहे.

असो. या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं लगेचच मिळणार नाहीत. पण त्या दृष्टीने मी वाचन/विचार करतोय यात समाधान आहे.

अरुण देशपांडे आणि Sustainable Development - भाग १

अरूण देशपांडे यांच्या 'आमी तुमच्या पिशवीत मावतच न्हायी' पुस्तकातील एका लेखाचा थोडासा भाग.

****************

"
तुम्ही धरणांच्या एवढे विरोधात का आहात? आता हेच बघा, आम्ही कोयनेच्या कोकणातील पाचव्या टप्प्यात वीज निर्माण करून समुद्रात वाया जाणारे पाणी पुन्हा दुष्काळग्रस्त देशावर (?) आणणार आहोत." एक तडफदार आय.ए.एस. अधिकारी तारे तोडत होते.

नैसर्गिकरित्या सूर्यशक्तीने खारं पाणी 'डिस्टिल्ड' होऊन गोड्या स्वरूपात मिळाल्यानंतर (उर्ध्वपतनासाठी लागलेली ऊर्जा मोजावी) प्रचंड ऊर्जा खर्च करून हजारो धरणग्रस्तांना धुळीला मिळवून,हजारो हेक्टर बारमाही हिरवेगार, घनदाट जंगल पाण्यात कायमचे बुडवून (त्या जंगलाचे दरवर्षी निरंतरपणे हेक्टरी २० टन जळाऊ लाकूड दिलं असतं ती ऊर्जा मोजावीच) बांधलेल्या धरणात साठवायचं. त्यात अत्यंत मौल्यवान, दुर्मिळ गोड्या पाण्यासाठी पूर्वेचे अख्खे दख्खनचे पठार दुष्काळात तडफडत असताना ते गोडे पाणी पुन्हा पश्चिमेच्या त्याच खार्‍या पाण्याच्या समुद्रात फेकून द्यायचं आणि पडताना मिळणारी ती ऊर्जा (!) विजेत रूपांतरीत करायची व ती महागडी वीज अत्यंत अकार्यक्षमतेने (५ टक्के कार्यक्षमता) वापरायची. याला बौद्धिक दिवाळखोरी म्हणतात. उदा. कोयना प्रकल्प, मुळशी ,पवना, टाटा इलेक्ट्रिक कंपनीचे प्रकल्प इ. ही दिवाळखोरी कमी पडली की काय म्हणून त्या प्रचंड जलाशयांच्या तळात प्रचंड भोके पाडून उरलेसुरले 'डिस्टिल्ड वॉटर' खार्‍या समुद्रात फेकून द्यायचे. त्याला लेक टॅपिंगचे महान तांत्रिक यश म्हणून समारंभपूर्वक आपल्याच टिपर्‍या बडवीत सगळ्यांनी नाचायचे. याला काय म्हणावे? हे सर्व वाचल्यानंतर सर्व मि. प्रॅक्टिकल मंडळी त्या आडदांड मिस्त्रीप्रमाणे अंगावर धावून येणारच आहेत, पण काय करणार? 'सब कुछ दिखता है| बादशहा नंगा है' असे जोरात ओरडून कोणाला तरी सांगावेच लागते.

एखादा साधा गोबर गॅस प्लांट काय किंवा अणुऊर्जा प्रकल्प काय, त्यांचं ऊर्जा आणि पर्यावरणीय ताळेबंद मांडावेच लागणार आहेत. त्यावेळी आडदांड,बंदबुद्धी, मि. प्रॅक्टिकल मंडळी ताळेबंद मागणार्या आणि मांडणार्यांच्या अंगावर धावून जाणार आहेतच. (सध्याचा गोबरगॅस प्लांट ऊर्जा दिवाळखोर आहे. तो बनवायला लागलेली ऊर्जा त्याच्या आयुष्यात परत मिळत नाही. तीच गोष्ट सौरघटाची आहे.)

शेती म्हणजे मानवी बुद्धिमत्ता ज्ञान वापरून वाढवलेल्या वनस्पतींनी केलेले प्रकाशसंश्लेषण (कल्चर्ड फोटोसिंथेसिस) शेतीत अंतराळातून रोज येणारी , मोफत मिळणारी सौर ऊर्जा वापरून वनस्पतीद्वारा हजारे प्रकारचे पदार्थ तयार केले जातात. ही शेती करीत असताना काही प्रमाणात पूर्वी साठवलेली सौरऊर्जा वापरावी लागते. उदा. माणसे,पशू यांची स्नायूशक्ती. पण ती तयार होणार्या अन्नशक्तीपेक्षा पुष्कळच कमी लागते. म्हणजे खरं निरंतर चालणारं यंत्र म्हणजे शेतीच. (आणि जंगलेसुद्धा) ते यंत्र निरंतरपणे चिरंजीवी पद्धतीने (सस्टेनेबल) चालवायचं म्हणजे मानवी बुद्धिमत्तेचा कस लागतो. ते सर्व सोडून देऊन महामूर रासायनिक खतं,पर्यावरणीय संतुलनाचा विनाश करणारी किडनाशकं, जमिनींचा सत्यानाश करणारी बेजबाबदार सिंचन व्यवस्था,खोल खोल भोकं पाडून प्रचंड ऊर्जा खर्चून वर उपसलेले पाणी (३०० फुटांचे बोअर म्हणजे तीस मजली इमारतीच्या गच्चीवर पाणी नेऊन शेती करण्याइतके हास्यास्पद आहे.) . वापरून केलेली आधुनिक शेती म्हणजे बौद्धिक दिवाळखोरीच आहे. निरंतरपणे फुकट मिळणार्या सौरशक्तीचे एका अन्न कॅलरीत रूपांतर करण्यासाठी पाच पेट्रोकॅलरी आणि ती एक अन्नकॅलरी लांब लांब अंतरावरील बांडगुळी शहरी महानगरी ग्राहकांच्या तोंडापर्यंत नेण्यासाठी आणखी वीस-पंचवीस पेट्रोकॅलरीज खर्चायच्या. एवढेच नाही तर त्या सगळ्याला हरितक्रांती, धवलक्रांती आणि प्रगती ,स्वावलंबन म्हणून नाचायचे. या सगळ्या क्रांत्या अरबस्तानातून येणार्या तिथे साठविल्या गेलेल्या कधीतरी संपणार्या लाखो वर्षापूर्वीच्या सौरऊर्जेवर म्हणजे क्रूड ऑइलवर अवलंबून आहेत बरं! या क्रांत्यांचेही ऑडिट करावेच लागणार आहे. त्यावेळीही ही आडदांड,आडमुठी 'ज्ञानदांडगी' मि. प्रॅक्टिकल मंडळी अंगावर येणारच आहेत.