मन ये बावरा
"बावरा मन देखने चला एक सपना
बावरेसे मन की देखो बावरी है बातें
बावरीसी धडकनें है बावरी है साँसे
बावरीसी करवटोंसे निंदिया क्यों भागे
बावरेसे नैन चाहे बावरे झरोखोंसे बावरे नजारोंको तकना
बावरा मन देखने चला एक सपना"
म्हटलं तर आयुष्य किती सोप्पं आहे. नोकरी करावी, संसार करावा, छंद जोपासावेत, गप्पा मारायला चार मित्र जवळ असावेत. आपण कोणाच्या अध्यात ना मध्यात. जगाचं काही का होऊ देत आपण आपलं पहावं आणि आनंदात रहावं.
यात चूक काय आहे? काहीच नाही.
पण हे असले विचार मनाला पटत नाहीत. उगाचंच कासावीस व्हायला होतं.
मुळातच समाज ही संकल्पना माझ्यासाठी महत्त्वाची आहे. आपण जे काही आहोत, जे काही करतो आहोत त्यातून आजूबाजूच्या चार लोकांना काहीतरी मिळालं पाहिजे ही त्यामागची भावना. त्याचप्रमाणे इतरांकडून काही गोष्टींची अपेक्षा ठेवणे आणि त्या न मिळाल्यास चीड येणं हेदेखील तितकंच स्वाभावीक....या गोष्टी मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी होत्याच पण आत्तापर्यंत त्या तितक्या प्रकर्षाने समोर आल्या नव्हत्या आणि त्यावर तितका सखोल विचारही झाला नव्हता.
काही दिवसांपूर्वी तापत असलेल्या आरक्षणाविरुध्दच्या आंदोलनात मी नकळत ओढला गेलो. मोर्च्यांमधे भाग घेतला, त्यानिमित्ताने नवीन लोकांच्या ओळखी झाल्या. Meetings ना गेलो, काही गोष्टींचं Planning केलं, पुण्यातील एका मोर्च्यात स्वत:ला अटक करवून घेतली. नंतर पोलिस स्टेशन पाहण्याचा योग आला, कोर्टाची पायरी चढण्याचा योग आला.
त्यानंतरही सर्व प्रकारचे प्रयत्न चालूच होते. त्यात प्रत्यक्ष राष्ट्रपतींना भेटून त्यांच्याशी बोलण्याची संधी मिळाली. सगळं झालं.
अनेक नव्या गोष्टी कळल्या. Dedication ने कामं करणारी लोकं भेटली, भरपूर गप्पा मारणारी आणि वेळ आली की पळून जाणारी लोकंही भेटली. त्याउलट "मला राजकारणात जायचंय आणि I'm serious about it" असं मनापासून सांगणारे तरुण भेटले. काही मतलबी लोकं भेटली. स्वत:चा स्वार्थ डोळ्यासमोर ठेवून येणारी लोकं भेटली. वादविवाद झाले. प्रसंगी भांडणेही. एकंदरीतच हा अनुभव खूप वेगळा होता.
या सगळ्या प्रकारात उत्साहाचे क्षण होते तसेच नैराश्याचेही. अनेक लोकांबरोबर झालेल्या ओळखी, वृत्तपत्रांच्या ऑफिसात घातलेल्या खेपा, पोलिस स्टेशन, कोर्ट यांचे अनुभव, वकीलांचा अनुभव या सगळ्यांमुळे बऱ्याच गोष्टी खूप जवळून पाहायला मिळाल्या. आजूबाजूच्या गोष्टी पाहून बऱ्याचदा त्रासच झाला. घरात बसून तमाशा पाहणं मला कधीच पटलं नाही पण एखादी गोष्ट मिळवण्यासाठी रस्त्यावर उतरणंही तितकं सोपं नाहीये याची जाणीव झाली.
स्वत:च्याच नादात असलेल्या मला अचानक आजूबाजूच्या समाजाचं भान आलंय. मला हे मान्य करावंच लागेल की आता माझा उत्साह बराच ओसरलाय. अनेक नवे प्रश्न उभे राहिलेत. आपल्याला नक्की काय हवंय हे कळेनासं झालंय. सध्या हातात एकच गोष्ट आहे..या प्रश्नांची शांतपणे उत्तरं शोधणं. माझं वाचन फारच कमी आहे. आपल्याला खूप जास्त वाचायला हवंय याची प्रकर्षाने जाणीव झालीये. यातून काही प्रश्न सुटतील असं वाटतंय.
"हजारों ख्वाहिशें ऐसि" मधलं हे गाणं आजकाल मी पुन्हापुन्हा ऐकतो. गाण्याचा भावार्थ माझ्या मन:स्थितीशी अगदी मिळताजुळता आहे..
"बावरा मन देखने चला एक सपना"
